Thursday, 19 June 2014

शर्वरीचा ताप

"आई ग, उठ ना , खूप थंडी वाजतेय", शर्वरीच्या (वय वर्ष १२) हाकेने झोप चाळवली माझी. ए. सी. मुळे होत असेल असा , असा विचार करून तिच्यावर अजून एक रजई पांघरली . परत ," आई, खूप थंडी वाजतेय गं ". असा आवाज ऐकल्यावर मात्र चंगलीच जाग आली मला. आणखीन एक रजई पांघरत ए सी बंद केला आणि तिच्या गळ्याला हात लावून बघितला , तर हाताला चटका बसला. गडबडीत उपेंद्र ला उठवलं आणि क्रोसिन शोधायला सांगितली . क्रोसिन घेतल्यावर मात्र ताप लगेच उतरला तिचा . साधारण ४ वाजता परत झोपले.
रविवार चा दिवस मात्र फ्रेश होती ती . दुपारी परत अंग तापतय असा वाटल्यावर , क्रोसिन दिली तीला . माग फ्रेश झाली. दुसर्या दिवशीपासून शाळा सुरु होणार म्हणून थोडी खरेदी करायची होती. "बरं वाटतय आता मला , मी पण येणारच" असा हट्ट करून शर्वरी पण आमच्याबरोबर आली. जाता जाता शेजारच्या हॉस्पिटल मध्ये दाखवून जाऊ असा विचार करून आम्ही निघालो . त्यांनी कॅल्पोल आणि झीफी लिहून दिली आणि तीन दिवसात जर फरक नाही पडला तर मलेरिया ची टेस्ट करायला सांगितली . खरेदी संपता संपता शर्वरी ला परत थंडी वाजायला सुरवात झाली. आम्ही गडबडीने घरी आलो आणि तिला कॅल्पोलची गोळी दिली. थोड्या वेळाने तिला बरं वाटल .
रविवारी साधारण २ वाजता परत ताप यायला लागला. यावेळी मात्र तिच्या एका हाकेसरशी उठले मी . लगेच कॅल्पोल द्याव का यावर माझी आणि उपेंद्र ची चर्चा झाली . शेवटी हॉस्पिटल मधेच फोन करून विचारव असा ठरलं . तोपर्यंत ताप १०३ झाला होता. डॉक्टरांचा परत फोन येईपर्यंत तिच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवायाला सुरवात केली . तापाचा चटका थोडा कमी वाटला. खूप थंडी वाजत होती तिला . कॅल्पोल दिल्यावर पण ताप उतरला नाही . उतरल्यासारखा वाटला पण थर्मामीटर वर चेच्क केला तर १०२ होता . त्यातच डोक दुखतंय , पाय दुखत आहेत म्हणुन रडारड सुरु झाली तिची . आता मात्र काळजी वाटायला लागली होती . ताप तरी कमी यायला हवा होता . थोड्या वेळाने तापाच्या ग्लानी ने झोपली ती . कदाचित आता ताप कमी होईल असा वाटून गेला मला.
सोमवार सकाळी तीच पोट पण दुखायला लागलं आणि चक्कर पण यायला लागली. मग मात्र डॉक्टरांच्या कडे परत जावून याव असा ठरवलं आम्ही. साधारण ९-९.३० वाजता त्याच हॉस्पिटल मध्ये घेवून गेलो तिला. डॉक्टर औषध बदलून देतील असा वाटल आम्हाला. डॉक्टरांनी तपासाल तर ताप १०१. ८ होता . म्हणजे रात्री चढलेला ताप उतरलाच न्हवता. त्यांनी सांगितलं , तुम्ही अडमिट करा तिला . मलेरिया किंवा व्हायरल असू शकतो . जोपर्यंत रक्त तपासात नाही तोपर्यंत काहीच सांगता येणार नाही. झालं , मला काहीच सुचेनास झाल, काळजी अजूनच वाढली. शर्वरी ला अडमिट करायचं ठरवलं. अडमिट करेपर्यंत ठीक होती ती , पण जसा सलाईन लावण्यासाठी दोन नर्सेस नि तिचा हात धरला तशी घाबरली ती. रडायला लागली . इंजेक्शन ला खूप घाबरणारी ती , सलाईन साठी तयारच होईना. "झालं  , झालं ", म्हणत त्यातल्या एका नर्सने सुई खुपसली. मग तर तिने ठणाणा करायला सुरवात केली.  तिथूनच तपाण्यासाठी म्हणून त्यांनी रक्त घेतलं आणि अण्टिबयोटिक ची बाटली लावली . १-२ मिनिटात शांत झाली ती . माग मात्र हात दुखतोय म्हणायला लागली. तिच्या हातावरून हात फिरवत असताना , मला मात्र खूप वाईट वाटत होतं. सतत दंगा-मस्ती करणारी माझी लेक अशी शांत पडलेली बघून कसातरीच होत होता मला. यावर्षी शाळेच्या सुरवातीलाच आमची हॉस्पिटल वारी झाली.
ती थोडी शांत झालेली बघून मी आई-बाबांना फोन लावला . आपण कितीही मोठे झालो, अनुभवी झालो तरी आई-बाबांपेक्षा कधीच मोठे होत नाही. दोघांनी पण समजूत घातली . सगळ ठीकच होईल म्हणून सांगितलं. मगं जरा बरं वाटलं.
रिपोर्ट काय येईल याची सारखी धाकधूक लागून राहिली होती. मलेरिया असू नये , व्हायरलचं असावा , एवढी एकचं इच्छा होती. तिचे एकामागून एक सलाईन सुरूच होते.  उपेंद्रच्या आणि माझ्या घर ते हॉस्पिटल आणि हॉस्पिटल ते घर अशा फेर्या सुरु झाल्या . दुपारी तिच्यासाठी तुप मेतकुट भात घेवून आले पण चार घासांच्यावरती तिने तो खाल्ला नाही. साधारण ४-४.३० वाजता रिपोर्ट आला आणि मलेरिया नाही हे कळलं . हुश्श वाटल एकदम , डोक्यावरच ओझं उतरल्यासारखं वाटलं. तोपर्यंत ताप पण उतरतं आला होता . आता तो १०० वर होता. रात्री झोपताना तिला सलाईन लावू नका म्हणून सांगितलं , कारण तिला एकाच कुशीवर झोपणं अवघड गेलं असतं. तशीपण अनोळखी जागा म्हणून तिला झोप आली नाहीच , आणि तिला झोप नाही म्हणून मी पण झोपले नाही.
सकाळी उपेंद्र आला आणि मी नाश्त्याला तिला काहीतरी करून घेवून याव म्हणून घरी गेले . परत आले तर शर्वरी छान गाढ झोपली होती. तिला तसाच झोपु दिलं. सोमवार रात्रीपासून तिला ताप न्हवता. त्यामुळे घरी जाण्यासाठी डॉक्टरांना विचारव असा ठरवलं . डॉक्टर राउंड ला आल्यावर ते नाही म्हणाले, उद्या सोडू असा सांगितलं त्यांनी. ताप उतरला असला तरी तीच पोट मात्र दुखत होतं अजुन , म्हणून त्यांनी सोनोग्राफी करून यायला सांगितली. सोनोग्राफी साठी जाताना , सलाईन ची सुई तशीच होती . पण ती टोचतयं आणि हात खूप दुखतोय म्हणून शर्वरी रडायला लागली . मग नर्स ला बोलावून ती सुई च काढायला सांगितली . तर परत आल्यावर सलाईन नको म्हणून अधे मध्ये दंगा सुरु झाला तिचा . सोनोग्राफी झाली आणि तो पण रिपोर्ट नॉर्मल आला . आता मात्र डॉक्टरांनी तुम्ही संध्याकाळी घरी घेवून जावू शकता असा सांगितलं . पण जायच्या आधी दोन इंजेक्शन घ्यायची होती  , आणि ती पण शिरेत , म्हजे सलाईन जसा देतात तशी . ते आईकून शर्वरीन आधीच दंग सुरु केला. तिला कसबस शांत केलं. आणि संध्याकाळच संध्याकाळी बघू म्हणून सांगितलं. घरी परत जायचं या विचारानेच फ्रेश झाली ती एकदम. ५.३०-६ ला नर्से नि इंजेक्शन दिलं , थोडा दंग केला, पण घरी जायचं आहे या आनंदाने लगेच गप्प पण झाली.
शेवटी घरी आलो आम्ही . ३ दिवसाची काळजी संपली .  आता मात्र सक्त ताकीद आहे तीला, हा एक आठवडा खेळण बंद . विश्रांती घ्यायची . सध्यातरी 'हो' म्हटलं आहे तिने .

Tuesday, 17 June 2014

संध्याकाळ

मस्त धुपाचा वास असलेली, हवेत किंचींत थंडावा असलेली 'संध्याकाळ'
शुभंकरोती म्हणणारी, उदबत्तीचा वास असणारी  'संध्याकाळ'
मनाला हुरहुर लावणारी, सुर्याला बुडताना बघणारी  'संध्याकाळ'
कुटुंबा समवेत बाहेर फिरायला येणारी 'संध्याकाळ'
कुटुंबाची हक्काची असणारी 'संध्याकाळ'
उद्याचे plans ठरवणारी  'संध्याकाळ'
मित्रांची मैफल जमवणारी 'संध्याकाळ'
पावसाळ्यात अंधार उगाचच मनात पण दाटुन आणणारी  'संध्याकाळ'
दिवस संपला म्हणुन थकलेलं मन आणि शरीर घरी घेवुन जाणारी 'संध्याकाळ'
प्रवासातली 'संध्याकाळ'
हरीहरन , जगजीतसिंग च्या गझ़़ल ऐकणारी 'संध्याकाळ'
जगाच एकटेपण घेउन येणारी 'संध्याकाळ'
समुद्रावरची मन शांत करणारी  'संध्याकाळ'
अभ्यास करणारी 'संध्याकाळ'
कधी मनाला सावरणारी तर कधी बेभान करणारी  'संध्याकाळ'
कुणाची तरी वाट पहाणारी 'संध्याकाळ'
लसणीच्या फोडणीच्या वासाची 'संध्याकाळ'
रस्त्याकडेला बसलेल्या भाजीवाल्यांच्या ओरडण्यची 'संध्याकाळ'
दिव्यंाची  'संध्याकाळ'
कट्ट्यावर जमणार्या आजोबांची 'संध्याकाळ'
नाक्यावर जमणार्या मित्रांची 'संध्याकाळ'
लोकलच्या खडखडाची, घरी परतणार्या आतुर मनांची  'संध्याकाळ'
मैत्रीणींबरोबर खरेदिचा बेत करणारी 'संध्याकाळ'
त्या दोघांच्या नाज़ुक क्षणांची साक्षीदार 'संध्याकाळ'
त्याला निरोप देताना मन दाटुन आलेली  'संध्याकाळ'


Friday, 13 June 2014

दिवाळी

माझ्या लहानपणाच्या ज्या काही गोष्टी मला आवडतात त्या मध्ये "दिवाळी" हा सण जास्त आवडतो.
कोल्हापूरच्या दिवाळीची मजा काही औरच होती. शाळेच्या सहामाहीच्या परीक्षा झाल्या रे झाल्या कि दिवाळी चे वेध लागायचे. कधी एकदा दिवाळी येते असा होवून जयच. याच मुख्य कारण म्हणजे दिवाळी ला वाजवायला मिळणारे फटके, नवीन कपडे आणि फराळ .
आईबरोबर महाद्वार रोड ला भटकून ड्रेस खरेदी व्हायची. मग घरही साफ सफाई आणि फराळाची तयारी. आईच्या नोकरीमुळे फराळाचा गोंधळ जास्त नसायचा. फक्त शंकरपाळी आणि चिवडा घरी व्हायचा, कधीतरी चकली पण , बाकीचं सगळं विकत आणलं जायचं. मी जशी ९-१० वीत गेले तसं शंकरपाळी मीच करायला लागले . आई घरात नसताना अशी लुडबुड करायला मज्जा यायची . तसे बरेच प्रयोग केले आहेत मी. कधी म्हैसूरपाक तर कधी जिलेबी , पावभाजी, मिसळ आणि वेगवेगळ्या भाज्या तर नेहमीचं केल्या जायच्या. असो, विषयांतर नको .
बाबा आणि केदार फटके घेवून यायचे , पण अगदी १-२ दिवस आधी. आकाशकंदील आणायचं खातं पण त्यांच्याकडेच होतं. त्यावेळी फार फ़शनबल आकाशकंदील मिळत नसत आणि वापरले पण जात नसत. आमचा आकाशकंदील ठरलेला असायचा , तो म्हणजे चांदणी.
जसजशी दिवाळी जवळ यायची तसतशी माझी excitement वाढत जायची. एकदम उत्साही वगैरे वाटायला लागायचं . या सगळ्यामध्ये रांगोळीची आणि पणतीची खरेदी हा पण महत्वाचा मुद्दा असायचा, अर्थात माझ्यापुरता. वेगवेगळे रंग आधीच आणून ठेवणे, पेपर वर उदबत्तीने भोकं पडून ठिपक्यांच्या रांगोळी ची तयारी करणे, रांगोळीची नवीन पुस्तकं आणून , रांगोळी काढायची प्रक्टिस करणे वगैरे सगळं सुरु असायचं. अशातच कॉलेज ला असताना संस्कारभारतीची रांगोळी शिकले , मग काय? दरवर्षी तीच रांगोळी काढायचे.
नरक चतुर्दशीचा आदला दिवस म्हणजे 'धनत्रयोदशी'. हि म्हणे बायाकांची दिवाळी असते, पण मला असले फरक कधीच मान्य न्हवते. त्यामुळे माझी दिवाळी माझ्या भावाबरोबर नरक चतुर्दशीलाच असायची .
बघता बघता नरक चतुर्दशीचा दिवस यायचा , उजाडायचा नाही कारण उजाडायच्या आतचं आई मला उठवायची , ते पण भल्या पहाटे ४ वाजता. थंडी असायची पण दिवाळी सुश्रु झाली या नादात ती बोचायाची नाही. पटकन चहा घेवून मी दारासमोरचा बोळ झाडून घ्यायचे. मग सडा घालायचा. आणि जिथे जिथे पाणी साचून राहिलं आहे तेवढंच फडक्याने टिपून घ्यायचे . रांगोळी काढायची माझी तयारी व्हायची. हळू हळू आजूबाजूच्या घरातून पण सगळ्या यायला सुरवात झाली असायची . रांगोळी काढताना पण एका झटक्यात जर ती झाली तर रांगोळी कसली? आधी ठिपक्यांची ठरलेली रांगोळी काढायची, ते ठिपके जोडताना कुठेतरी चुकायचं , माग ती पुसायची , दुसरी काढायची . कधी कधी वैतागून मी फ्री हान्ड काढून रिकामी व्हायचे. असा करत करत ५. ३० पर्यंत ती तयार व्हायची . मग मी घरात यायचे. बाबा आणि केदार तयार झालेले असायचे. मग अंगाला तेल लावून अभ्यंगस्नान व्हायचं आणि मी तयार व्हायचे. नवीन कपडे घालायची मजा यायची. माझे आणि केदार चे फटाके आधीच वाटलेले असायचे. त्याची पिशवी वेगळी आणि माझी वेगळी असायची. मला सुतळी बॉम्ब वाजवायची भीती वाटायची, त्यामुळे ते सगळे केदार कडे जायचे . माझ्याकडे लवंगी  फटका,लक्ष्मी तोटे , झाड , भुइचक्कर, पेन्सिली, दोर्या, नागगोळ्या , काडेपेटी आणि वेगवेगळ्या रंगाच्या आणि साध्या अशा फुलबाज्या असायच्या. यातसुद्धा फटके पुरावेत म्हणून आम्ही लवंगी ची माळ सोडून एक एक फटाकी उडवायचो . बोळातला केदार चा मित्र फटके उडवायची सुरवात करायचा ते पण दरवर्षी ५ वाजता एक सुतळी बॉम्ब लावून.
त्या दिवशीचे फटाके उडवून झाले की, मग आम्ही अंबाबाईला जाउन यायचो. परत आलो कि फराळ खायचा आणि मग परत हुंदडायला मोकळे. आई ला सुट्टी नसायची . मग एक चक्कर मोठ्या काकांकडे व्हायची.
संध्याकाळ झाली कि पणत्या लावायची तयारी करायची. मोठ्या दरवाजाच्या बाहेर दोन पणत्या आणि अंगणातल्या प्रत्येक कुंडीत एक , अशा पणत्या लावायचे मी. अंगणात टांगलेला आकाशकंदील आणि ओळीने तेवत असलेल्या पणात्यांमुळे अंगण एकदम सुरेख दिसायचं.
खरी मजा यायची ती लक्ष्मिपुजनाला. धाकट्या काकाचा फॅब्रीकेशन चा कारखाना होता , राजारामपुरीत. आमच लक्ष्मीपूजन तिथे व्हायचं. पुजेची सगळी तयारी करून सगळे काका-काकु आणि आम्ही सगळी भावंड तिथे पोहोचायचो. तिथे फुलं आणि फटाके आधीच आणून ठेवलेले असायचे . मी आणि माझ्या बहिणी , आम्ही जमीन झाडून घ्यायचो आणि त्यावर पाण्याचा सडा टाकायचो. आमच्यातली मोठी बहिण रांगोळी काढायची आणि आम्ही सगळ्या त्यात रंग भरायचं काम करायचो. कधी एकदा पूजा होते असा होवून जायचं. पूजा झाली रे झाली कि आम्ही लगेच फटाके उडवायला पळायचो . सगळेच बरोबर असल्यामुळे धमाल यायची.
दिवाळीत मी वाट बघायचे ती भाऊबीजेची. कारण त्या दिवशी मी आधीच घेतलेला ड्रेस मिळायचा मला . त्यावेळी वर्षातून दोनदाच मोठी खरेदी व्हायची , एक दिवाळी आणि दुसरा वाढदिवस, दिवाळीमधे दोन ड्रेस घेतले जायचे. अधे मधे कापड खरेदी क्वचित व्हायची.
ते दिवस खरचं खूप खास होते . सगळं लिमिटेड असून पण त्यातून मिळणारा आनंद अनलिमिटेड होता . खूप वाटत ते दिवस परत यावेत . मी जशी दिवाळी अनुभवली तशी माझ्या मुलीला पण अनुभवायला मिळावी. 

Wednesday, 11 June 2014

माझं कोल्हापूर

प्रजू च्या मुंजीनंतर परत येताना , परत एकदा काहीतरी माग ठेवून आल्याची जाणीव झाली. कळव्याला येवून आता ९-१० वर्ष झाली आहेत. पण अजूनही कोल्हापूर ची ओढ तशीच आहे. मधल्या काळात जायला न जमल्यामुळे ती कमी झाली असं उगाचच वाटत होतं. पण तसं काहीच नाहीये. ती ओढ , परत येतेनाच एकटेपण सगळं तसच आहे.
  कोल्हापूरची ओढ मला कायम वाटतं आली आहे. "माझं कोल्हापूर" आता बदलत चाललं आहे पण हे बदलण पण अपरिहार्य आहे. अंबाबाई ची महालक्ष्मी झाली आहे , आधी ज्या देवळातून जाताना कुणाची परवानगी लागत न्हवती तिथे आता दर्शन घेणार असाल तरच प्रवेश मिळतो, आणि दर्शनाला जाव तर लांबच लांब रांग असते. गेल्या ४-५ वर्षात मी फक्त मुखदर्शन घेतलं आहे.

मी शाळेत असताना कधीच रांगेत उभ रहाव लागल नहिये. देवळात आलो कि सरळ आत प्रवेश मिळायचा , अगदी नवरात्रीत सुद्धा. शाळा सुटली कि देवीच दर्शन घ्यायचं आणि मग घरी जायचं , हे अगदी शाळा B.Com. संपेपर्यंत सुरु होतं. अर्थात कॉलेज ला गेल्यावर रांगा सुरु झाल्याच होत्या पण आत्तासारखी परिस्थिती न्हवती.
अंबाबाईच्या देवाळाशेजारी  आमची शाळा आहे. "विद्यापीठ हायस्कुल ". घरापासून अगदी १० मिनिट चालत जाण्याच्या अंतरावर . साधारण ५वी ला गेल्यापासुन मी आणि केदार आम्ही दोघेच शाळेत जायला लागलो. तो ७वी मध्ये होता. वांगी बोळातून बाहेर महाद्वार रोड ला यायचं आणि मग तेथून अंबाबाई च्या देवळातून शाळेला जायचा आमचा शिरस्ता होता. अंबाबाई च्या देवळाच्या बाहेर आणि शाळेच्या बाहेर एक बाई गोळ्या , चिंचा , आवळे, ओली आवळासुपारी असं सगळं घेवून बसायची. कधीतरी घरातून मिळालेल्या चार आण्यात मनसोक्त खाता येईल असा मेवा यायचा . परवा सहज चौकशी केली तर ५-१० रुपयाच्या खाली काही मिळताच न्हवतं. पण चव मात्र तीच , तोंडाला पाणी सुटणारी.
शाळेच्या बाहेर , पटांगणातच बकरे सरांच एक दुकान होतं . साध्या फळकुटांनी बनलेलं. त्यांच्याकडे मिसळ मिळायची . पावाची (bread ) ची भाजी आणि त्यावर हरभर्याची रस्सा उसळ. मस्त तिखट असायची ती.आता तशी मिसळ कुठेच मिळात नाही.
अजून एक मोठा जाणवलेला बदल म्हणजे लोकांनी स्वत:च्या घराचं परिवर्तन यात्रेकरुंच्या निवासासाठी केल आहे . करूदेत बापडे , पण हा बदल इतका जास्त आहे कि, सगळीकडे असे यात्रेकरू निवास दृष्टीस पडत आहेत. अजून एक म्हणजे, रिक्शावाल्यांच्या तोंडची भाषा बदलत चालली आहे, काही वर्षापूर्वी जिथे अस्सल कोल्हापुरी भाषा ऐकू यायची तिथे आता "किधर जाना है ?" असा ऐकायला मिळतं.
तीच गोष्ट रंकाळ्याची. लहानपणीचा रंकाळा अजूनही आठवतो मला. स्वछ:, शालिनी पलेस पर्यंतच असणारा, रंकाळा. तिथे मी आणि माझी भावंड जायचो, जाताना भडंग, शेंगदाणे वगैरे घेवूनच जायचो. तिथल्या गवतात बसून कागदावर भडंग खायची मजा काही औरच होती. शालिनी पाय्लेस च्या समोरच्या बागेत जाण म्हणजे खूप लांब आल्यासारख वाटायचं. तिथे जाणं म्हणजे चैन होती. तिथे गाड्यावर मिळणारी पाव भाजी( हाफ प्लेट ) आणि आइसक्रीम खाल्ल कि दिवस सार्थकी लागल्यासारखा वाटायचा. आता मात्र सगळं बदललं आहे, रंकाळा सुशोभित करण्याच्या नादात पाणी घाण होत चाललं आहे याकडे मात्र दुर्लक्ष होत चाललं आहे.



तरीही, काही गोष्टी अजूनही तशाच आहेत, शिवाजी पेठ , तिथली भाषा , रांगडेपण, लोकांमधली माणुसकी , मदतीला धावून जाणं, सगळ तसचं तर आहे. म्हणूनच माझ कोल्हापूर मला प्रिय आहे.
आणि म्हणूनच माझी ओढ पण तशीच आहे.



Friday, 23 May 2014

वयम् मोठम् खोटम्

मला वक्तृत्वाची आवड पहिल्यापासून होती. पण नाटकांची आवड मात्र ५वी पासून लागली.  त्याचं झालं असं, ५वी मध्ये असताना सगळ्यात पहिल्यांदा मी एकांकीकेमध्ये काम केलं.एकांकीकेचं नाव होतं, पु. ल. देशपांडे लिखित 'वयम् मोठम् खोटम्'.
तर झालं असं, ५वी आणि ६वी च्या सगळ्या तुकड्यांमधून नोटिस फिरली, सगळ्या विद्यार्थ्यांनींनी शाळा सुटल्यावर तळघरात जमावे. त्याप्रमाणे आम्ही सगळ्याजणी तळघरात जमलो. बाईंनी सगळ्यांना बालभारतीचं  पुस्तक काढून धडा वाचायला सांगितला. अगदी ५-५ ओळी वाचल्या प्रत्येकीने. मग आमच्यामधील काही जणींना घरी जायला सांगितले. आता आम्ही फक्त २०-२५ जणीचं राहिलो. मग बाईंनी आम्हाला एक पुस्तक दिलं आणि त्यातील एक पान वाचायला सांगितलं . माझं वाचून झाल्यावर मला बाजूला बसायला सांगितलं. अजून १-२ जणी पण माझ्याबरोबर होत्या. उरलेल्या मुलींपैकी ३-४ ना घरी जायला सांगुन , बाईंनी परत एकदा वाचन घेतलं. असा करत करत आम्ही ६जणीच राहिलो फक्त. बाईंनी सांगितलं , ' तुमची नाटकात निवडं झाली आहे. उद्या माझ्याकडे येवून प्रत्येकीने पुस्तक घेवून जायचं आहे'.
मी पळत पळतच घरी आले. याआधी एकांकीकेत कधीही काम केलं  नसल्यामुळे मला खूप आनंद झाला होता. आईला पण खुप कौतुक वाटलं. दुसर्या दिवशी बाईंकडे जाऊन पुस्तक  घेवून आले आणि सगळ्यात आधी ते वाचून काढालं. मला कुणाचं कुणाच काम मिळणार माहिती नसल्यामुळे उत्सुकता खुप होती. सगळ्यात आधी वाचनाची तालीम सुरु झाली आणि कळलं कि मी मुख्य भूमिकेत असणार आहे, 'आजोबा' च्या. एकांकीकेची सुरवात आणि शेवट माझ्याच वाक्याने होणार होता.
रोजच्या रोज तालीम सुरु झाली आमची. शाळा सुटल्यावर तळघरात जमत असू आम्ही. दुसर्या  कुणालाही आम्ही काय करतो हे कळू नये म्हणून बाई खबरदारी घ्यायच्या. आमची एकांकीका होती ती मुख्याध्यापक संघाच्या स्पर्धेसाठी. इथे मुलाचं आणि मुलींचं अशा दोन एकांकीका जातात. आणि मुलींची एकांकीका बसवणाऱ्या बाई आणि मुलाची एकांकीका बसवणारे सर यांच्यात पण स्पर्धा असायची. म्हणून बाई खबरदारी घ्यायच्या. असो, बघता बघता आमची एकांकीका आकाराला यायला लागली. खूप मज्जा यायची त्यावेळी. सगळ्यात मजेची गोष्ट म्हणजे आम्हा सगळ्यांना सगळी एकांकीका पाठ झाली होती. त्यामुळे कुणी कुठे चुकली तर बाकीच्या सगळ्या भूमिकेचं भान विसरून तिला तीच काय चुकलं याची आठवण करून द्यायच्या. बाई ओरडायच्या मग आम्हाला.
कधी कधी आम्हाला तळघर मिळायचं नाही तालीमीसाठी, मग बाई रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेत आमची तालीम घ्यायच्या.
स्पर्धेचा दिवस जसजसा जवळ यायला लागला तशा आमच्या तालमी पूर्ण पूर्ण दिवस व्हायला लागल्या. एकदा असाच बाईंनी आमची एकांकीका ६वी च्या वर्गासमोर करायची ठरवली. आधी आमच्या मधल्या ६वी च्या मुली लाजल्या . पण एकदा एकांकीका सुरु झाल्यावर मात्र आम्ही सगळ्या भान विसरून गेलो. आणि, तेवढ्यात आमच्यामधली एकजण वाक्य विसरली. आम्ही  सगळ्यांनी तत्परतेने तिला आठवण करून दिली. समोर बसलेला प्रेक्षकवर्ग फिदीफिदी हसायला लागला. आणि आम्हाला कळलं काय झालं आहे ते. आमच्यात हिम्मतच न्हवती बाईंकडे बघायची. आता मात्र बाईंनी बजावलं आम्हाला. आम्ही पण हो हो म्हटलं .
आमची एकांकिका स्पर्धेत काहीही विघ्न न येता सादर झाली.  आणि, विशेष म्हणजे दुसर्या क्रमांकाने आम्ही ती स्पर्धा जिंकली पणं. मलापण पहिल्या क्रमांकाच बक्षीस मिळालं. काही  दिवसांनी बक्षीस समारंभ होता . मला बेबी शकुन्तालांच्या हस्ते बक्षीस मिळालं.
                        यामध्ये जी आजोबा आहे ती मी आहे . 
                                                     बेबी शाकुंतलाच्या हस्ते बक्षीस घेताना

याच नाटकाची अजून एक आठवण म्हणजे आमच्या शाळेच्या शिक्षक दिनी ज्याला आम्ही केळवकर दिन म्हणतो,  त्या दिवशी या एकांकिका सगळ्या मुलांपुढे  सादर करायच्या असतात . त्या वर्षी भालजी पेंढारकर आले होते. मला अजूनही लख्खं आठवतं, एकांकिका संपल्यावर त्यांनी मला बोलावून आशीर्वाद दिले होते.
त्यांनतर काय आपली जागा फ़िक्स झाली. दरवर्षी  असायचेच , अपवाद फक्त ६ वीं आणि ८ वी चा. ८वी मधे मी संगीत संशयकल्लोळ मध्ये 'फाल्गुनराव' च काम केलं होतं.
         संशयकल्लोळ मधला फाल्गुनराव 
         ९ वी मध्ये केलेले नाटकं . नाव विसरले आता :(


या एकांकिकेने खूप काही दिला मला. माझा आत्मविश्वास वाढवला, नाटकांची गोडी लागली , वाचनाची आवड निर्माण झाली , पाटील बाईंसारख्या बाई मिळाल्या. शाळेत नंतर जरी एकांकिकेत कामं केली तरी , 'वयम् मोठम् खोटम्' च्या  वेळेची मजा काही औरचं होती.