Saturday, 16 January 2016

मुक्त

एक मोकळं आभाळ हवंय
उडण्यासाठी
एक मोकळा कॅनव्हास हवाय
व्यक्त होण्यासाठी
एक मोकळा अवकाश हवाय
झेप घेण्यासाठी
एक कुऱ्हाड हविये
या साखळ्या तोडण्यासाठी
एक हात हवाय
तोल सांभाळण्यासाठी
एक मुक्त मन हवंय
मनाला मुक्त करण्यासाठी 

--अनघा

Sunday, 10 January 2016

अर्थ


काही सांगायचे असते तेव्हाच शब्द हरवतात
शब्दांना शोधायचे असते तेव्हाच अर्थ हरवतात

गाळलेल्या जागांमधला अर्थ खुप काही सांगुन जातो
बरेचदा अर्था एेवजी अनर्थ करुन जातो

समजुतीच्या कुंपणामध्ये अर्थ बागडत असतो
हरवलेला शब्द कुंपण तोडुन आत शिरतो

आता काहीच उरलेलं नसतं
असतो तो फक्त अनर्थ, सगळीकडे व्यापून उरलेला

--अनघा

Friday, 8 January 2016

समुद्र


एक समुद्र तुझ्या ओंजळीमधे सामावलेला

अव्यक्त मनाच्या हळव्या कोपर्यात दडलेला


हळव्या नात्यांच्या आठवणीत हरवलेला
जमिनीवरून चंद्राला साद घालणारा

चंद्राच्या चांदणीने उचंबळणारा
किनार्याच्या साथीने चालणारा

एक समुद्र, तुझ्या ओंजळीमधुन
माझ्या ओंजळीत उतरणारा...
--अनघा

Tuesday, 15 September 2015

निसर्गाची जादु

जादु , निसर्गाची जादु .  पानांमध्ये दडलेली , फुलांमध्ये लपलेली . निसर्गाचा अविष्कार म्हणजे जादु .
त्याने दिलेली झाडं , पानं , फुलं , त्याच अस्तित्व म्हणजे जादु .
मनाला मोहिनी घालणारं , मनाची बंद कवाड उघडणारं , विरळाच असेल कुणी जो या जादु कडे आसक्त होत नसेल .
माझ्या बाल्कनी मध्ये मी काही झाडं लावली आहेत . खूप मस्त वाटतं. ते अवलंबून आहेत माझ्यावर आणि मला आवडते त्यांची काळजी घ्यायला .
मला आवडतं माझ्या बाल्कनी मध्ये बसून या जादूचा आस्वाद घ्यायला . झाडांवर येणारं नवीन पान , फुल , हे सगळ न्याहाळताना वेळ कसा जातो काही कळत नाही . प्रत्येक नवीन येणारं पान , त्याचा कोवळा रंग , हळू हळू मोठ होत जाताना बदलणारा , जास्तीत जास्त हिरवा होत जाणारा रंग , आणि मग  त्याच्या कडांवर येणारं पिवळेपण . सगळ जीवनचक्र दिसतं त्यात . गळणाऱ्या पानाबरोबर नवीन येणारी पण पण खूप काही सांगून जातात .
झाडांवर नवीन कळ्या दिसल्या कि जास्त गम्मत येते बघायला . खूप नाजूक असतात काही , तर काही हिरवी शाल लपेटून येतात . जेव्हा उमलतात तेव्हा सगळीकडे एक सुंदर प्रकाश पसरल्याची जाणीव होते .

Friday, 12 June 2015

आम्ही सगळे .....

परवा स्वमिनाथच्या लग्नात बरेच वर्षांनी आम्ही सगळे बहिण भाऊ एकत्र आलो. स्वामिनाथ म्हणजे माझ्या तीन नंबर काकाचा मुलगा . आता  या आधी आमच्या कुटुंबाविषयी सांगते जरा . माझे बाबा धरून ५ भाऊ होते (त्यातले २ काका खूप अकाली गेले . ३ नंबर चा नंदुकाका आणि ४ नंबर चा अप्पाकाका), आणि २ आत्या . एक बाबांपेक्षा मोठी आणि दुसरी लहान .
मोठे तात्याकाका , त्यांना तीन मुली आणि एक मुलगा. प्रज्ञाताई (तिला एक मुलगा आणि एक मुलगी ), संज्ञाअक्का ( तिला दोन मुली आणि दोन जुळी मुलं ), तिसरी बाबी म्हणजे पौर्णिमा (तिला दोन मुलं ), आणि पप्पू म्हणजे गुरुप्रसाद (याला एक मुलगा )
दुसरे बाबा , त्यांना आम्ही  दोघेच , केदार ( दोन मुलं) आणि मी (एक मुलगी).
तिसरा नंदुकाका , त्याला एक मुलगी आणि एक मुलगा. चिमी म्हणजे अमृता (हिला दोन मुलं ) आणि मिन्या म्हणजे स्वामिनाथ (याचाच नुक्त लग्न झालं )
चौथा अप्पाकाका , याला एकच  मुलगी , मुक्ता (तिला पण एकंच मुलगी )
पाचवा हेमाकाका , त्याला एक मुलगी आणि एक मुलगा, तेजश्री (दीडच वर्ष झालंय लग्नाला ) आणि हरीश (FY agri. )
मोठी आत्या म्हणजेच माईआत्या , तिला तीन मुली . वासुन्धाराक्का (हिला दोन मुलं ), वैशालीताई (हिला दोन मुली ) आणि मृदुला ( हिला एकच मुलगा )
लहान आत्या म्हणजे माया आत्या , तिला एक मुलगी आणि एक मुलगा . विभावरी म्हणजे आमची राही (हिला एकच मुलगी ) आणि आदया म्हणजे आदित्य (याच लग्न लवकरच करायचं आहे )
आता बघा , एवढं मोठं बारदान असेल तर प्रत्येक कार्यक्रमाला कुणाच न कुणाच काही ना काहीतरी कारण निघणारच .
म्हणूनच मिनुच लग्न स्पेशल ठरलं . कारण १-२ मुलं सोडली तर आमची सगळी पिढी आणि मागची सगळी पिढी हजर होती . बघता बघता गप्पा रंगल्या . कोण काय काय करंत यावरच्या गप्पा गॉसिप मध्ये कधी बदलल्या काही कळलंच नाही .
कुठतरी मनाला जाणवुन गेलं , आमच्यातले काही चाळीशीच्या वरचे झालेत, तर काही जवळ पोहोचलेत. आता आमची पिढी 'मोठी लोकं' या पंक्तीत यायला लागली तर. हळुहळू पुढच्या पिढीचं राज्य सुरु होणार .
बरेचदा असं वाटायचं , आपण एकमेकांना भेटलो नाही तर आपली मुलं त्यांच्या मामे , मावस भावंडाना ओळखतील का ? आमच्या वेळी हे सगळ सोप सुटसुटीत होतं . सगळे जवळपास राहत असल्यामुळे काही न काही कारणाने येण जाण व्हायचंच . पण आता मात्र नोकरी निमित्ताने आम्ही सगळेच विखुरलो आहोत , कुणी बेंगलोर , कुणी पुणे , कुणी ठाणे , काहीजण कोल्हापूर , तर काहीजण कोल्हापूर जवळ सांगली , गारगोटी , कारदगा , त्यात मुलांच्या परीक्षा , नोकरी आणि सासरच्या कार्यक्रमांना प्राधान्य . मग काय ? मधली काही वर्ष बघता बघता हातातुन निसटून गेली.
या लग्नामुळे निदान पुढची पिढी एकमेकाला  तरी . पुढे हीच नाती कितपत सांभाळली जातील माहिती नाही , पण जोपर्यंत आमची पिढी आहे तोपर्यंत तरी हे नातेसंबध नक्कीच जपले जातील .
सगळ्यात मोठ्या ताईचा मुलगा LLB व्हायच्या मार्गावर आहे तर सगळ्यात धाकट्या काकाचा मुलगा FY (agri. ) करतोय . या सगळ्या वयातल्या आम्हाला मात्र जाणवतंय , आपण आपले लहानपणीचे दिवस परत जगवले पाहिजेत .
प्लान तर ठरतोय , वर्षातून एकदा भेटायचा , फक्त सगळ्यांना जमलं पाहिजे .