Wednesday, 10 December 2014

थळ - एक अविस्मरणीय अनुभव

रोजच्या रुटीन चा कंटाळा यायला लागला  कि मन निसर्गाकडं ओढलं जातं . त्याला ताजतवानं होण्यासाठी निसर्गाची तहान लागते. मी पण खूप कंटाळले होते . ऑफिस ते घर , घर ते ऑफिस करून , सुट्टीच्या दिवशी माॅलला फेरफटका मारून मारून . काहीतरी छानस करावंसं वाटत होतं . पण काय कराव हे काही सुचंत नव्हंत . उपेंद्र म्हणाला, तुला एका छानशा जागी घेवून जातो यावेळी . म्हणून त्याने थळ ला बुकिंग केलं . नुसतच मोघम सांगितलं थळ बद्दल, अलिबाग जवळ आहे म्हणून  . नेट वरती माहिती बघितली तर तिथून जवळ एक लाईट हाऊस आहे असं कळलं . जातानाच प्लान केला लाईट हाऊस बघायचच म्हणुन. दोन दिवसाचा बेत ठरला .
सकाळी लवकर  उठून आम्ही अलिबाग च्या रस्त्याला लागलो . कर्नाळा बर्ड सेन्चुरीच्या इथून जाताना , प्रत्येकवेळी वाटतं इथे आलं पाहिजे, यावेळी पण परत एकदा ठरवलं कि इथे येवू आपण . जाताना "जैत रे जैत "मधला सुळका लागला . आणि मनात गाणं घुमायला लागलं , 'लिंगोबाचा डोंगुर आभाळी गेला '. मन प्रसन्न झालं .  आजुबाजुच्या झाडांमधून उगवणारा सुर्य बघायची मजा काही वेगळीच असते .
निसर्गाची पण नशा असते एक . बेभान व्हायला होतं . मनाच पाखरू होतं आणि भटकत राहतं,  झाडांवरून  , पानांवरून , फुलांवरून . बघता बघता आम्ही थळ ला पोहोचलो . थोडे चुकून , पुढे मागे जात शेवटी इच्छित स्थळी पोहोचलो आणि लक्षात आलं कि किहीम बीच अगदी जवळ आहे , जास्तीत जास्त १० मिनिटांवर .



जिथे उतरलो होतो तिथून जवळच एक सुंदर तलाव होता . सकाळच्या वेळी फुललेली कमळं ,  तिथे असणारे बगळे , आजुबाजूच थंड आणि शांत वातावरण. असं वाटतच नव्हंत कि आपण मुंबईच्या जवळ आहोत . एक वेगळंच जग , एक वेगळाच अनुभव.








































फ्रेश झालो आणि तिथल्या स्वागतिकेला जवळपास बघायला काय काय आहे विचारलं . तसं तिने मांडवा बीच , करमरकर शिल्प संग्रहालय, किहीम बीच सांगितला . इथून लाईट हाऊस किती लांब आहे विचारलं तर म्हणाली , 'तसा ब-यापैकी लांब आहे , पण गाडी जाते तिथं पर्यंत '.
आम्ही सगळ्यात आधी किहीम बीच ला जायचं ठरवलं , शर्वरी ला पाण्यात खेळायचं होतं . अर्थात मला पण . दुपारी मांडवा आणि मग करमरकर संग्रहालय .
किहीम बीच वरती पोहोचल्यावर गर्दी अगदीच कमी आहे हे जाणवलं . तसं उपेन्द्राला वाटलं आपण काशीद बीच ला जाऊ . काशीद बीच पण जवळ आहे तिथून साधारण २०किमी  वगैरे असेल . पण मला मात्र वाटलं कि आपण इथेच थांबू . काशीद ला गर्दी खूप असते , त्यापेक्षा हा शांत आहे . हो नाही करता करता शेवटी आम्ही किहीम लाच थांबायचं ठरवलं .



मी आणि शर्वरी लगेच पाण्यात शिरलो . लाटांबरोबर खेळण्याची मजा काही औरच असते . वेळेच भान निघून जातं. समोर पसरलेला अफाट समुद्र ,नजर जाईल तिथपर्यंत फक्त पाणी आणि त्याला टेकलेलं आभाळ . यावर असणारे ठिपके म्हणजे आपण . समोरून येणाऱ्या लाटा अंगावर झेलत आम्ही कमरेएवढ्या पाण्यात उभे होतो . मोठ्या लाटेबरोबर  मागे ढकललो जायचो आणि परत पुढे यायचो . थोडे मागे होवून येणाऱ्या लाटांवर उड्या मारण्याची मजा शब्दात सांगतां येणं अवघड . एकमेकांच्या अंगावर पाणी उडवण्याचा खेळ खेळताना परत एकदा लहान झाल्यासारखं वाटलं .

खूप वेळ खेळलो आम्ही . शेवटी साधारण १ वाजता भूक लागल्यावर बाहेर आलो . मी ताडीची फळं आणि शर्वरी ने शहाळं घेतलं . मग सावकाश आम्ही परत आलो . इतके थकलो होतो कि जेवण करून मस्त ताणून दिली . ४ वाजता कशीबशी जाग आली . थंडीचे दिवस असल्याने आणि तसा प्रदेश अनोळखी असल्याने मांडव्याला लवकर जायचं ठरवलं होतं . त्याप्रमाणे ५-५.१५ ला बाहेर पडलो .




मांडवा , अग्निपथ मधून भेटलेला . तस्करांसाठी सोयीच ठिकाण म्हणून माहिती असलेला . खूप उत्सुकता होती , मांडवा बघायची . जसे आम्ही मांडव्याजवळ पोहोचलो तसं डोळ्याचे पारणे फेडतील असे बंगले दिसायला लागले .झाडांमधून लपलेले , भले मोठे असे . बघता बघता आम्ही मांडवा जेट्टी जवळ पोहोचलो .




 लोकांची ही गर्दी . तिथून गेट वे ला जायला . हा मुंबईला पोहोचायचा सगळ्यात जवळचा मार्ग . सकाळी ८. १५ पासून बोट आहे गेट वे साठी . तासा दीड तासात मुंबई .


 मांडव्याच्या  किनार्यावरून मुंबईचे दिवे दिसतात . आम्ही बराच वेळ थांबलो , येणा-या आणि जाणा-या लोकांची गर्दी बघत .
























मांडव्याच्या किना-यावरुन गेल (GAIL ) चे दिवे लांबून  एखाद्या अनिमेटेड सिनेमा मधील स्वप्नांच्या शहरासारखे दिसतात .






बराच अंधार झाल्यावर आम्ही तेथुन निघालो . आता करमरकर संग्रहालय शोधायचं होतं. इथलं एक वैशिष्ट्य म्हणजे सगळेजण मदत करायला अगदी तयार. " इथून सरळ जावा , पुढे राईट घ्या , आणि मग थोडे पुढे जाउन लेफ्ट घ्या ". इतक्या सूचना असून पण रस्ता चुकायचा तसा चुकतोच . शेवटी विचारत विचारत एका वळणावर पोहोचलो . इथून आम्हाला राईट घ्यायचा होता . आम्ही वळलो तसा सगळा रस्ता अंधारात बुडालेला होता . काय करावं कळेना , म्हणून जवळ असलेल्या काकांना विचारलं . तर ते म्हणाले ," मी इथून जवळचं ६ मैलांवर राहतो . तुम्ही मला तिथे सोडा आणि मग तसेच डावीकडे सरळ जा , सासवण्यात पोहोचाल ".
आम्हाला दुसरा काही पर्यायच नव्हता . काका गाडीत बसले आणि मग गप्पा सुरु झाल्या . तेवढ्यात समोरून एक भली मोठी कार पास झाली . तसे काका म्हणाले ," आमचं गाव आता ५star झालं आहे. " आणि मग बोलण्याच्या नादात कळलं कि त्यांची १०० एकर जमीन आहे . त्यांच्या एका बाजूला सचिन तेंडूलकरने जमीन घेतली आहे आणि जवळच जुही चावला ने पण .
आम्ही एका तळ्यावरून थोडे पुढे आलो आणि कळलं कि त्या तळ्याच्या पलीकडे संजय मांजरेकर चा बंगला आहे आणि त्याने आपल्या आईच्या नावाने तळ्याभोवती बाक ठेवले आहेत . रस्त्यावर अजीबात लाईट नव्हते त्यामुळे आजूबाजूचा अंदाज फारसा येत नव्हता .आम्हाला आलेला टेन्शन बघून काका थोडा पुढपर्यंत आले आणि मग सरळ जावा सांगून निघून गेले . आम्ही तसेच पुढे आलो , आणि शेवटी सासवणेला पोहोचलो . तिथे करमरकर संग्रहालय सगळ्यांना माहिती आहे .
जशा पाय-या चढून गेलो तशा सुनंदा करमरकर ( शिल्पकारांची सून ) आम्हाला  खुर्चीत बसलेल्या दिसल्या .


 त्यांनी लगेच आत या म्हटलं आणि शेजारच्या दिवाणाकडे बोट दाखवून बसायला सांगितलं . त्यांना बोलायची खूप हौस आहे . आणि विषय पण भरपूर आहेत . बोलायच्या ओघात त्यांनी बराच काही सांगितलं . त्या एकट्या तिथे राहतात . मदतीला एक आज्जी आहेत आणि एक त्यांनी सांभाळलेला मुलगा आहे . घरातली शिस्त लष्करी आहे . शिल्पकारांचा मुलगा लष्करात होता. अतिशय व्यवस्थित आहे घर त्याचं. त्या खाली रहातात आणि वरती संग्रहालय आहे .
सुनंदाताई , वय वर्षे ८० . गेली २१ वर्षे एकट्या राहतात तिथे , त्यांचा मुलगा , सुन आणि दोन्ही नाती अमेरिकेत असतात . दर सहा महिन्यांनी मुलगा किंवा सुन चक्कर मारतात . या पण कधी कधी तिकडे जातात . त्या ठणठणीत आहेत , स्वयंपाक वगैरे करतात अजून .त्यांच्याकडे १९६० मधला ओवन आहे आणि अजूनही आम्ही त्यात बिस्कीट वगैरे करतो म्हणाल्यावर मी थक्क झाले . प्रचंड उत्साही आहेत त्या .  त्यांना बघितल्यावर मला त्या खूप आवडल्या . तरुणपणी दिसायला त्या नक्की सुरेख असतील हे पण जाणवलं. कलकत्त्याला रहात   असताना त्यांनी मदर तेरेसां बरोबर काम केलं आहे.
 आम्ही संग्रहालय बघायला गेलो . शिल्पं अतिशयं सुरेख आहेत . खूप बारकाईने केलेलं काम जाणवत . सुनंदाताई म्हणाल्या तसं शिल्पकारांचं नुसतं डोळ्यांच काम बघून पण थक्क व्हायला होतं .


आपल्याला डोळ्यांमधला फरक जाणवायला लागतो . कुणाचे डोळे काळे असतील , तर कुणाचे निळे, हा फरक स्पष्ट जाणवतो . चेह-यांवरचे भाव तर अप्रतिमच !





त्यांनी केलेलं एक शिल्प आहे , हिरा कोळीणीच . साधारण १५-१६ वर्षांच्या त्या मुलीचं शिल्प इतकं अप्रतिम आहे , कि ते तिथे जाऊनचं पहावं.




स्वत:च्या मुलीचं ती ४ आठवड्याची असताना केलेला चेहरा , नंतर वेगवेगळ्या वयातली शिल्पं तर परीसस्पर्श जाणावूनच देतात. शिवरायांचा पुतळा तर निव्वळ अप्रतिम .


गांधीजींच स्वतः समोर बसून केलेलं शिल्प , रबिन्द्रनाथ टागोरांच आधुनिक  प्रकारातलं शिल्प, अशी तिथे ठेवलेली सगळी शिल्पं डोळ्याचं पारणं फेडतात. धन्य तो शिल्पकार ! आजच्या दिवसातला , हे संग्रहालय म्हणजे कळस ठरलं .







अतिशय छान वाटत होतं आम्हाला परत येताना .

दुसरा दिवस उजाडला तोच पक्ष्यांच्या किलबिलाटाने .
































































आता वेळ होती लाईट हाऊस ची  . आम्ही नेहमीप्रमाणं विचारत विचारत निघालो . तर ते अलिबागच्या थोडं पुढं असल्याचं कळंल . आम्हाला वाटलं रेवदांड्याला आहे . म्हणून तिथपर्यंत गेलो तर कळंल कि ते अजून थोडं पुढे मुरुड - जंजिरा च्या वाटेवर आहे . गावाच नाव आहे "कोर्लाई" . गाव अगदी छोटं आहे . रस्ते जेमतेम एक गाडी जाईल असे . गावाच्या टोकाला , डोंगरावरती लाईट हाऊस आहे . वाटेवरती मासळी वाळवताना बायका दिसत होत्या .



किनार्याजवळ थोड्या उंचीवर बांधून घेतलेले चौथारे आणि त्यावर  वाळंत घातलेली मासळी .























 लाईट हाऊस पर्यंत जाण्याची वाट म्हणजे एक कच्चा रस्ता . एका बाजूला डोंगर आणि दुस-या बाजूला समुद्र . त्यातून समोरून जर दुसरी गाडी आली तर दोघांपैकी एकाला मागे जाण्याशिवाय पर्याय नाही .








लाईट हाऊस छोटं आहे . आणि सोलर वरती चालंत . तिथे असणारे लाईट हाऊसमन सगळी माहिती देतात , आणि फी आहे फक्त १०रु. आपण अगदी वरती लाईट जिथे असतो तिथपर्यंत जाऊ शकतो . त्या लाईटच्या दोन मिनटात किती फे-या होतात यावरती तो कोणत्या ठिकाणी आहे हे समुद्रातील जहाजांना कळतं .लाईट हाऊस आणि परिसर अतिशय सुंदर आहे . जुन्या पद्धतीचं दगडी बांधकाम आहे. या ठिकाणाचं कितीही वर्णन केलं तरी अपुरं आहे .








यावेळी परत निघताना खूप समाधानी वाटत होतं . एक अविस्मरणीय अनुभव होता . परत जाउन सगळं नेहमीप्रमाणे सुरु होणारच होतं , पण निसर्गाच्या सहवासातले हे दोन दिवस कसे गेले ते कळलंच नाही .

Friday, 5 December 2014

जगणं

तुझ्या पाऊलखुणा शोधतेय
समुद्राच्या लाटांनी लपवलेल्या
आपण एकत्र चालत असताना उमटलेल्या

मला ओळखू येत नाही आहेत आता त्या वाटा 
ज्या आपण एकत्र तुडवल्या होत्या
आता फक्त माझीच पावलं उमटलेली दिसतात धुळीवर

आपण एकत्र लावलेला मोगरा फुलत नाही आता
त्याला पण एकटं वाटत रे ,
माझ्यासारखं

आपलं जग सुनं सुनं आहे आता ,
तुझ्या हाका नाहीत  , कुरवाळणं नाही
तुझा स्पर्श नाही

सगळं थांबलाय , स्तब्ध झालंय , माझ्यासारखं
ये ना तू , परत एकदा , सगळं जिवंत करायला
माझं जगणं परत सुरु करायला