Monday, 25 August 2014

तु

माझ्या मनाच्या कोपर्यात असणारा तु… असा अचानक उसळी मारुन वरती येतोस. . आणि मला जाणीव करून देतोस, तू आहेस … माझ्याबरोबर आहेस … माझ्या मनामध्ये तुझा वावर सततचा आहे… पण तू कुणाला दिसत नाहीस … मी जी कुणी आहे ती तुझ्यामुळे आहे… तुझ्यामुळे मला अस्तित्व आहे …
कधी कधी वाटतं तु हरवला आहेस… दूर कुठेतरी निघुन गेला आहेस…माझा सखा मला सोडून गेला आहे… मग मी शोधत राहते तुला … माझ्यामध्ये… माझ्या मनामध्ये … आजुबाजूच्या लोकांमध्ये, कुठे दिसतोस का ते बघते… तुझी एखादी झलक … एक नजर … कुठे आहे , कुठे आहे ? कितीही, काहीही केलं तरी मनाचा धोशा काही कमी होत नाही. माझं मन माझ ऐकत नाही … खरतर उगाचच असं म्हणायचं , तसंपण ते तुझंच ऐकतं … त्याला फक्त तुझ्याच सूचना कळतात. मेंदूचा भुगा होईपर्यंत विचार करते मी … मग थकते… तू निघून गेला आहेस अशी समजूत काढते स्वतःची, म्हणजे कुणाची , ते माहिती नाही , कारण, तू आयुष्यात आलास आणि मी माझी राहिले नाही… मन आक्रंदत राहतं… माझा सखा शाम मुरारी इथेच आहे … कुठेच नाही गेला आहे… पण दुसरं मन ऐकत नाही ते सारखं म्हणंत रहातं तो नाहीये … जो होता तो एक भास होता … तो तुझा कधीच नव्हता … तुला वाटंत होतं अस… मनाच्या भांडणामध्ये मी थकते … गप्प बसते
पण डोळे तुलाच शोधत राहतात … मन तुलाच साद घालत रहातं … तुझ्या अवतीभवती करणाऱ्या मनाला गप्प बसवण जमत नाही मला …
आणि अगदी अचानक असा  काहीतरी घडतं ज्यामुळे मला जाणीव होते परत, तू असल्याची… माझ्या जवळ असल्याची… माझ्या मनात असल्याची … तू कुठेच गेलेला नसतोस … माझ्या जवळच असतोस … माझ्या मनामध्ये … मलाच उगाच वाटत तू निघून गेला आहेस म्हणून … पण तू या वेडाबाईला सोडून गेलेलाच नसतोस… तू इथेच असतोस…  माझं मन व्यापून उरणारा माझा सखा सावळा … माझा शाम मुरारी … हि जाणीव नाहीशी व्हावीशी वाटते आता … तुझ्यामध्ये हरवुन जावसं वाटतं … या जाणीव नेणीवाच्या पलीकडे … जिथे फक्त तु आणि तुच असशील …

Tuesday, 12 August 2014

whats app ची गरज खरचं किती ?

मध्ये काही दिवसांसाठी मी  whats app बंद केलं , म्हणजे अक्षरशा delete केलं. कारणं माझी होती . एका अर्थी आपण स्वताच स्वास्थ्य गमावत आहोत असा वाटत होतं . एकीकडे मला माझ्यासाठी वेळ हवा म्हणता म्हणता तोच वेळ या whats app वरती वाया जात होता . मित्र- मैत्रिणींशी गप्पा मारणं म्हणजे वाया जाणं ? असा प्रश्न बहुतेकांना पडेल . माझ्यासाठी नक्कीच . कारण मला असा वाटत कि आपण सतत मेसेज करून बोलण्यासारख काही नसतं. कारण बरेचदा विषय उगाचच लांबत जातात. तसंच, रोजच्या रोज सगळ्यांशी मेसेज वरती बोलण्यापेक्षा कधीतरी बोलणं कधीही भरपूर आनंद देतं. हे म्हणजे टेलिफोन चा शोध लागल्यावर लोकांनी एकमेकांना पत्र लिहायचं बंद केल्यासारख आहे . म्हणजे whats app आल्यावर जे बोलायला हवं ते मेसेज मधूनच बोललं जातं , मग त्या मेसेज चा अर्थ प्रत्येकजण काहीही काढू दे . का झालं असाव असं?
माझा तर्क असा आहे कि मेसेज पाठवताना ना आपल्या भावना समोरच्याला कळतात ना समोरच्याच्या आपल्याला . आणि यामुळे बरेचदा गैरसमज होतात . माझ्यासाठी खरा मुद्दा हा नाहीच आहे. कुठतरी असं वाटलं कि यामुळे अति तेथे माती होतं चाललं आहे . माझे नातेवाईक किंवा मित्र -मैत्रिणी यांच्याशी बोलल्यामुळ जो आनंद मिळायचा तो या whats app सारखे applications काढून घेत आहेत. काही दिवसांनी कळलेल्या बातम्यांमुळे  वाटणारं आश्चर्य राहिलाच नाही आहे . मान्य आहे कि याचे काही फायदे पण आहेत पण फायद्यांपेक्षा तोटेच जास्त दिसत आहेत .
ग्रुप वरती पाठवले जाणारे मेसेज हे माहिती देण्यापेक्षा , आपल्याला आला आहे ना? मग पाठवा या भावनेतूनच जास्त पाठवले जातात . येणारी माहिती , खरी आहे का खोटी आहे याचा विचार न करता पाठवली जाते . त्यातूनच अफवा पण पसरवल्या जातात . बरं , आपण ज्या ग्रुप वर असतो त्यातलेच काहीजण आपल्याबरोबरच अजूनही काही ग्रुप वर असतात . त्यामुळे एकाच पोस्ट सगळीकडे पाठवली जाते . बरेचदा असा होतं कि ग्रुप मध्ये असणाऱ्या सगळ्यांची बौद्धिक कुवत सारखी असतेच असं नाही , मग त्यातून समाज-गैरसमजाच एक वेगळचं नाटक रंगतं. काहीजणांसाठी हे असे ग्रुप त्यांचा व्यर्थ अभिमान कुरवाळणारे असतात, तर काहीजणांसाठी नुसता वेळ घालवण्याचे साधन . यामध्ये आपण आपला किती मौलिक वेळ वाया घालवत असतो याच भान कुणालाच नसतं. हाच वेळ काहीतरी चांगल्या गोष्टी करण्यात पण वापरता येतो.
या सगळ्यामुळे येणारा ताण हा टाळण्यासारखा नसतो . आणि जिथे आपण आपल्या जवळच्या लोकांशी चार जिव्हाळ्याच्या गप्पा मारायच्या तिथे अजूनच तणावग्रस्त होत जातो .
 मनाला जास्त जाणवत राहिलं कि आपलं बोलणं संपत चाललं आहे , आणि फक्त मेसेजेस ची देवघेव उरली आहे . हे सगळ वेळेत टाळण्यासाठी मी हे app पूर्णपणे बंद केलं होतं. साधारण एक आठवडा. पण तो एक आठवडा खूप सुखाचा ठरला . एक तर सारखं काय मेसेज आले आहेत हे बघायची माझी सवय मोडली , आणि मी online नाहीये याची बहुतेकांना सवय झाली .
एका आठवड्याने हे app मी परत सुरु केलं , याला कारण यावरून पाठवता येणारे फोटो आणि जे बाहेरच्या देशात माझे मित्र - मैत्रिणी आहेत त्यांच्या संपर्कात राहता यावं म्हणून .जे इथे आहेत , भारतात त्यांना अधून मधून फोन करायचं मात्र नक्की केलं आहे , आणि करते पण आहे. त्यांचे कि मन तृप्त होतं , जे १०० मेसेजेस पाठवून पण होत नाही. पण ग्रुप नको . कारण अति जेवल कि अजीर्ण होतं , तसा काहीसं झालं आहे. त्यामुळे माझं वापरणं अगदी कमी झालं आहे. 

Monday, 11 August 2014

कळसुबाई

कळसुबाई , महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखर ,समुद्र सपाटी पासून ५४०० फुट उंचीवर असणारं हे शिखर . दोन वर्षापूर्वी 'शिखर वेध ' बरोबर जायचं नक्की केला , पण आयत्यावेळी तब्येतीच्या कारणास्तव जाता आलं नाही . मनाला सारख लागून राहिलं , आपण कळसुबाई ला जाऊ शकलो नाही . या वर्षी ठरवलं होतचं, काहीही झाल तरी कळसुबाई चा ट्रेक करायचाच.
शिखर वेध च्या तिसर्या बॅच बरोबर जायचं ठरवलं , पण ऐनवेळी शर्वरीची तब्येत बिघडली आणि माझ जाणं परत रद्द झालं. मनात आल यावर्षी पण कळसुबाई आपल्या नशिबात दिसत नाही , म्हणून मग पेब फोर्ट ला तरी जाऊ असा म्हणून तो ट्रेक ठरवला आणि त्याच दिवशी जगदीशचा (शिखरवेध चा सर्वेसर्वा) मेल आला कि चौथी बॅच १० ऑगस्ट ला जाणार आहे. मनात आलं पेब नको , कळसुबाई ला जाऊ . तसा सांगितलं जगदीशला . शेवटपर्यंत धाकधूक होती मनात . ऎनवेळी ट्रेक रद्द होईल अशी भीती वाटत राहिली . शर्वरी हट्ट धरून बसली , मी पण येते . जरा टेंशन आलं , आता कसा समजवायचं ? मग कशीतरी समजूत काढली . कळसुबाई ला जाण्यासाठी बस मला नाशिक - भिवंडी टोल नाक्याच्या इथे मला घेवून जाण्यासाठी थांबणार होती. आणि वेळ होती रात्री साधारण १२ वाजता ची . उपेंद्र सोडायला येणार होता. साधारण ११.४५ ला जगदीश ला फोन केला , तर त्यावेळी तो सायन ला होता येपर्यंत अजून अर्धा -पाऊण तास तरी सहज लागणार होता . तिथून तो ठाण्यात तीन हात नाक्याला अजून दोघांना घेवून मग मला घेण्यासाठी येणार होता. शेवटी १ वाजता बस आली आणि आम्ही निघालो . बस मध्ये डुलकी काढायचा प्रयत्न केला पण फारशी झोप लागली नाही. ४ वाजता आम्ही बारी ला पोहोचलो . आणि बस मधेच डुलकी काढली. हवा थंड होती . साधारण उजाडल्यावर एक एक जण खाली उतरायला लागला . आजुबाजूच वातावरण प्रसन्न होतं . हवा ढगाळ असली तरी , थंड असल्यामुळे मस्त वाटत होतं. आजूबाजूच्या घरातील बायका तिथेच असलेल्या बोर चे पाणी भरायला आल्या होत्या . त्या शांत वातावरणात तोच काय तो आवाज ऎकु येत होता. आमचा चहा आणि नाश्ता झाल्यावर आम्ही निघणार होतो.
साधारण ७ वाजता आम्ही सगळे आटोपून निघालो . सुरवातीला ओढ्यामधून जाताना पाणी खूप गार असल्याच जाणवलं . शेत पार केलं आणि आता चढायला सुरवात केली. मी अगदी हळू चढते , एक तर सवय नाही अज्जिबात त्यामुळे थकायला खूप चटकन होतं. दुसरं , फोटो काढायचे म्हणून कॅमेरा घेतला होता , त्याच ओझ होत खूप . हळू हळू वार जात होते , बाकी सगळे त्यामानान पटपट निघाले होते .चढताना काहीतरी खायला मिळेल म्हणून २-३ कुत्री पण आमच्या बरोबर चढायला लागली .
मी चढत असताना वाटेत थांबत होते, थांबले कि डासांसारखे किडे पायाला चावत होते. पायावर त्यामुळे लालसर वर्तुळ आणि जिथे तो किडा चावायाचा तिथे थोडा जास्त लाल असा दिसत होतं .  थोडी पुढे गेल्यावर , जगदीश ने कॅमेरा ब्याग घेतली , म्हणजे तरी मी पटपट चढेन असा वाटल त्याला . पण , आमची गोगलगाय काही आपला वेग बदलायला तयार नाही . असो , हा ट्रेक सोपा समजला जातो कारण वरपर्यंत जाण्यासाठी शिड्या आहेत, काही लोखंडाच्या तर काही दगडांच्या . पण अंतर जास्त आहे . आम्ही वर जात असताना अधे मध्ये येणारी पावसाची सर सगळ थंड करून सोडत होती . खूप छान वाटत होतं .डोक्यावरून जाणारे ते पावसाचे ढग अतिशय सुंदर दिसत होते . ट्रेक सोपा असला तरी लोखंडी शिडीवरून जाताना धडकी भरत होती. खाली पडलो तर कपाळमोक्ष नक्कीच होता . मधेच मी जगदीश ला विचारलं अजून किती बाकी आहे , तो म्हणाला आपण ६५ % पूर्ण केलं आहे . बापरे! एवढं चढून पण ६५% च?? मला वाटत होतं , फार तर १०-१५% राहिलं असेल आता. मध्ये मध्ये थांबत थांबत जात असताना आजूबाजूला निसर्गानं काय उधळण केली आहे ते दिसत होत. त्या शांत वातावरणात येणारा पक्ष्यांचा आवाज आणि दोन्ही बाजूला कोसळणाऱ्या धबधब्यांचा आवाज . आपण शहरात राहून कोणत्या गोष्टीना मुकतो हे खूप तीव्रतेन जाणवलं. साधारण ७०-७५ % ट्रेक पूर्ण झाल्यावर , थोडा थांबून शिडीवरून खाली बघितलं तर दरी दिसतचं नव्हती , सगळीकडे ढगांच पांघरूण दिसत होतं. फारतर १०-१२ फुटांपर्यंत झाडी दिसत होती , त्यापुढे ढगांच पांघरूण.
चढता चढता मधेच थांबून काढलेले  फोटो 



हा मेलेला साप आढळला . तसाच एक जिवंत साप पण दिसला होता . काहीतरी मटकावून शांत पडला होता . पोट बराच फुगलेलं होतं त्याचं . 













वरती जाताना वाटेत दोन ठिकाणी भजी आणि चहा विकणारी २-३ दुकानं होती . खूप इच्छा झाली , पण त्रास होईल (मागच्या ट्रेक चा अनुभव) म्हणून मी टाळलं. वाटेत वेगवेगळ्या प्रकारची फुलं उमललेली दिसली . काही पांढरी तर काही जांभळी .





















हळू हळू वरती चढत शेवटी मी पोहोचले , पाय अतिशय दुखत होते . पण वरती पोहोचल्यावर सगळं विसरले . कळसुबाई आपण चढलो याचाच आनंद खूप झाला.  आजूबाजूला असणारे पावसाचे ढग त्यामुळे फारसं काही दिसत नव्हतं  . आपण पावसाच्या ढगात आहोत असा काहीसं मनाला वाटत होतं. वरती वारा मात्र भरपूर होता ,जोडीला पाउस आणि थंडी होतीच . आम्ही फार वेळ थांबू शकलो नाही . लगेच उतरायला सुरवात केली . आता मात्र परीक्षा होती . वर चढताना जाणवलं नाही पण उतरताना मात्र अन्तर खूप असल्याची जाणीव झाली. त्यातच सतत पाउस पडल्यामुळे परतीचा रस्ता निसरडा झाल्याची शक्यता खूप होती. हळू हळू उतरायला सुरवात केली . पाय मात्र आता जाम बोलायला लागले होते . प्रत्येक पाउल जड झालं होतं . त्यात सुद्धा शिड्या बर्या वाटत होत्या उतरताना , पण दगडांवरून उतरताना मात्र हालत वाईट होत होती . सगळीकडे निसरडं झाल्यामुळे खूप जपून उतरावं लागत होतं . आमच्या ग्रुप मधल्या एका मुलीच्या बुटाच सोल निघालं , तिला चालताना जाम त्रास होत होता. १-२ जण फ्लोटर घालून आले होते , त्यांचे पाय घसरत होते . बरीच कसरत चालू होती . मला मात्र आपण खालीपर्यंत कधी पोहोचणारच नाही असं काहीसं वाटायला लागलं होतं . अजून थोडा पुढे, अजून थोडा पुढे करत करत शेवटी मी खाली उतरले. येताना पाय आणि बूट इतके मातीने बरबटले होते कि ओढ्यातून तशीच चालत गेले , खरंतर बूट काढायची ताकदच राहिली नव्हती . पण ती खूप मोठी चूक झाली. पाणी खूप थंड होतं . बुटात पूर्ण पाणी  भरलं आणि पाय एकदम गार झाले . आमच्यातले काहीजण तिथ जवळच असणारा धबधबा बघायला गेले .मी मात्र तशीच चालत बस पर्यंत आले . आणि बूट काढून बसमध्ये ठेवले . बसमध्ये बसल्यावर  मात्र खूप बऱ वाटलं . एक लढाई जिंकल्याच समाधान मिळालं .

सगळे परत आल्यावर आम्ही जेवलो . जेवायला बटाट्याची भाजी , उसळ, चपाती , भात आणि वरण असा मेनू होता . जाम भूक लागली होती , त्यामुळे जेवण मस्त वाटलं एकदम . जेवण झाल्यावर आम्ही परत निघालो. बस मध्ये आता सगळेच डुलक्या काढायला लागले. साधारण ७ वाजता मी टोल नाक्याला पोहोचले . उपेंद्र आला होता घ्यायला . घरी येवून एकदा अंघोळ करून मेतकुट भात खाल्यावर मात्र मला एकदम सगळ्याच सार्थक झाल्यासारख वाटल  . पाय मात्र अजूनही खूप दुखत आहेत , पण एक समाधान पण आहे.

Saturday, 2 August 2014

मैत्री , मनान स्वीकारलेलं नात - मेधा

माझी दुसरी अत्यंत जवळची मैत्रीण म्हणजे मेधा . माझ्या घराजवळ रहायची पण आमची मैत्री व्हायला ११ वी उजाडायला लागली . आमची ओळख झाली ती एका कॉमन मैत्रिणीमुळे. आणि नंतर आम्हीच जास्त जवळच्या मैत्रिणी झालो . दोघी पण भांडायचो भरपूर , पण भांडलो नाही तर दिवस सुनासुना जायचा . तिला आणि मला , दोघींना पण भटकायची सवय खूप त्यामुळे एकत्र फिरायचो पण भरपूर . अर्थात, आमची जोडी लौरेल औंड हार्डी ची होती . ती एकदम नाजूक चणीची आणि बारीक होती पण काटक खूप .खुप रसिक, खरतर तिच्यामुळे मी पार्लर ला जायला लागले . कॉलेज मध्ये आमचे ग्रुप वेगवेगळे होते , पण जाण येण एकत्र आणि राहणं जवळं त्यामुळे आमच्यात कधी अंतर पडल नाही .
first year पासून आमच कॉलेज सकाळी असायचं. मग काय ? आम्ही लवकर उठून , तयार होवून एकत्रच जायचो. कॉलेज संपल कि एकत्रच परत यायचो. दुपारी माझ्या घरी कुणी असायचं नाही , मग मेधा थोडा वेळ येवून बसायची आणि मग झोपायला जायची . तिचे बाबा काही बाबतीत खूप शिस्तीचे होते , जसं दुपारी तिने थोडा वेळ झोपलं पाहिजेच हा दंडक होता त्यांच्यात . कधी कधी संध्याकाळचा स्वंपाक पण असायचा तिच्याकडे. तिची दुपारची झोप झाली कि आम्ही परत भटकून येत असु .
असा करता करता आमचं कॉलेज पूर्ण झालं , आणि दोघींना पण MBA करायचे वेध लागले . फक्त थोड्या उशिरा जाग्या झाल्यामुळे त्या वर्षीची CET झाली होती. मग मी कॉम्पुटर क्लास ला अडमिशन घेतली . माझा क्लास सकाळी असायचा. आम्ही आमचा दिनक्रम ठरवला .
सकाळी लवकर उठून आम्ही रंकाळ्यावर फिरायला जायचो. ५.४५ ला घरातून निघायचो , शालिनी पॅलेस समोर थोडावेळ बसायचो आणि मग परत यायचो . आवरून मी क्लास ला जायचे आणि साधारण ११-११. ३० पर्यंत परत यायचे . मगं ती आणि मी आम्ही भर उन्हाच्या बाजारात जायचो , रोज काही न काही आणायचं असायचं . बंर , मंडई घरापासून अगदी जवळ  असल्यामुळे कुणी नको पण म्हणायचे नाही . कधी कलिंगड आण तर कधी सीताफळ आण असा काही न काही कायम सुरु असायचचं . ते घेवून आम्ही माझ्या घरी यायचो आणि मनसोक्त हादडायचो. कधी कधी कलिंगडाच्या सोबतीला भजी वगैरे पण तळली जायची . धमाल असायची . संध्याकाळी आम्ही परत बाहेर पडायचो , कधी रंकाळा तर कधी भवानी मंडप असा फेरा मारायचो . तिथे दोघींमध्ये एक प्लेट पाणीपुरी नाहीतर अर्धी पावभाजी , नाहीतर सँडवीच, नाहीतर अर्धी चाट खायचोच , अगदी रोज .
   असच माझं एकदा शिवाजी विद्यापीठ मध्ये काम होतं म्हणून मी मेधा ला विचारलं तर ती येते म्हणाली . त्यावेळी माझ्याकडे लुना होती . आम्ही लुना घेवून जायचं ठरवलं . आणि विद्यापीठ परिसरात तिला लुना चालवायला द्यायचं मी कबुल केलं. काम संपवून परत येताना तिच्या हातात लुना होती,काय डोक्यातं आलं तिच्या देव जाणे . तिने एकदम भरधाव सोडली लुना , आणि एका वळणाला तिला ती आवरता न आल्यामुळे आम्ही दोघींनी साफ लोटांगण घातलं . त्यात तिचा पाय पायडलच्या मागे अडकला , भरपूर लागलं तिला . आमच्या सुदैवाने मागून काही मुलं येत होती , त्यांनी मदत केली . लुनाचा हेडलाईट तुटला होता आणि चाक पण वाकडं झालं होतं . परत येताना धाबे दणाणले होते आमचे , घरी काय सांगायचं ? अवतारावरून आम्ही पडलो होतो हे लगेच कळत होतं . शेवटी माझ्या घरी थोडं थांबून तिने घरी जायचं ठरवलं . माझ्या घरी लुना माझ्या हातात होती हे सांगायचं ठरलं आणि तिच्या घरी तिच्या . यामुळे बसणारा ओरडा कमी झाला असता आणि एकमेंकीना भेटण्यापासून  कुणी थांबवलं नसतं . घरी मी बाबांना सांगितलं तसं आणि हे पण सांगितलं कि लुना च हंड्ल वरखाली होत होतं म्हणून असं झालं. बाबा त्यावर केदार ला ओरडले . मला वाईट वाटलं पण काही इलाज नव्हता. मग आम्ही डॉक्टर कडे गेलो दोघी . जखमा बऱ्या व्हायला वेळ लागला पण आम्ही मात्र तशाच एकत्र राहिलो .
 पुढे २-३ महिन्यातचं तीच लग्न ठरलं आणि मग आमचं भटकण थोडं जास्त झालं. तिची आजी ओरडायची आम्हाला पण त्याने आम्हीला काही फरक पडा़चा नाही. बघता बघता लग्न झालं आणि ती सांगलीला गेली . आणि पूर्णपणे संसारात गुरफटली .
अजूनही आमच बोलणं होतं पण भेटणं मात्र खूप कमी झालं आहे , अर्थात यावर ती भरपूर शिव्या खाते कारण सध्यातरी तिच्याकडे आम्हा मैत्रिणींसाठी वेळ नसतो. अर्थात यात जमेची एकाच बाब म्हणजे तिची मुलगी आणि माझी मुलगी पण मैत्रिणी आहेत , खूप जवळच्या नाहीत पण एकमेकी बरोबर पूर्ण दिवस काढू शकतात असा तर नक्कीच आहेत .

Friday, 1 August 2014

मैत्री , मनान स्वीकारलेलं नात - पची

परवा ३ ऑगस्ट , मैत्री दिवस (friendship day ). असा दिवस जो आजकाल साजरा करायला बरेचजण धडपडतात. पण खरं तर हे नातं रोजच साजरं होतं , त्यासाठी विशिष्ट अशा दिवसाची काहीच गरज नसावी , असा मला वाटतं . सगळ्या नात्यांपेक्षा जास्त आपुलकीने जपलेले असा एकाच नातं असतं . मगं ते नवरा - बायकोमधील असो , आई -मुलांमधील मधील असो किंवा वडील-मुलांमधील असो.
अर्थात, या निमित्ताने मला माझ्या मित्र मैत्रिणींबद्दल काही न काही आठवत राहत , कडू गोड सगळंच . माझी मैत्री या शब्दाची ओळखच झाली ती एका मैत्रिणीमुळे.
साधारण ३-४थी मध्ये असू आम्ही तेव्हा . शनिवार असल्यामुळे आई लवकर घरी आली होती . दळप करायचं होता म्हणून ती आणि तिच्यामागे लागून मी , आम्ही गिरणी मध्ये गेलो . गिरणी घरापासून अगदी जवळ होती. अंगात शाळेचाच ड्रेस होता अजून. तिथे अजून एक माझ्यासारखीच मुलगी आणि तिची आई आल्या होत्या . तिच्या अंगावर पण माझ्याच शाळेचा युनिफॉर्म होता . अंगावर शाळेचा युनिफॉर्म असल्यामुळे त्या दोघींनी एकमेकींशी बोलायला सुरवात केली (म्हणजे आमच्या आयांनी ). मग आम्ही पण बोलायला लागलो. दोघी पण एकाच वयाच्या होतो पण शाळेत कधी बोललो न्हवतो. पण इथे मात्र बडबडायला सुरवात केली . मग ती घरी आली आणि येतंच राहिली . आमची घट्ट मैत्री झाली . भाऊ आणि माझा भाऊ पण एकाच वयाचे होते पण त्यांच्यात मात्र फारशी मैत्री जमली नाही . पण बरेचदा आम्ही चौघे एकत्र येवून धुमाकूळ घालायचो. तीच नाव प्रतिमा कुलकर्णी (पची). माझी सगळ्यात पहिली मैत्रीण. तिच्या आजीचा बंगला होता शिवाजी पार्क मध्ये , मी बरेचदा तिच्याबरोबर जायचे. तिच्याबरोबर असं जाणं खूप आवडायचं मला.  पुढे ५ वी ला आल्यावर मात्र आमच्या तुकड्या बदलल्या. ती वेगळ्या तुकडीत आणि मी वेगळ्या . दोघींना पण नवीन मैत्रिणी मिळाल्या . बरेचदा पाची ची आठवण यायची पण तोपर्यंत तिच्या पण मैत्रिणी झाल्या होत्याच. हळू हळू अंतर पडत गेलं. आधी नुसत्या बडबडणार्या आम्ही आता मात्र फारच कमी बोलत होतो . पुढे एकाच कॉलेज मध्ये असूनपण फारस बोलन व्हायचं नाहीच . त्यातच काका गेल्याच कळल आणि धक्काच बसला . तिच्या समोर पण जाऊ नये असा वाटत होतं ( किती मूर्खपणा होता तो , ते आता कळतंय ). मी आणि आई जाउन काकुना भेटून आलो . आमच B. Com. संपल आणि पची च लग्न झालं . अर्थात लग्नाला गेले होते मी पण एका लांबच्या मैत्रिणीच्या लग्नाला जाव तशी .(काय होता एवढ मनात माझ्या ? कशाचा इगो होता? अजूनही लक्षात येत नाही ). ती त्याच दिवशी नागपूर ला जाणार होती . तिला निरोप द्यायला मी गेले होते , रेल्वे स्टेशन वर. तीच शेवटची भेट. त्यानंतर तब्बल १३ वर्षांनी केदार चा फोन आला मला , तुला "कृतिका उदर " म्हणून एक friendship request आली आहे ना FB वर ? ती पची आहे . मी तीनताड उडाले . पची ?? कृतिका उदर ?? काही संदर्भाच लागेना . मी request मान्य केली . मग आम्ही बोलायला लागलो. तिने तीच नावच बदललं होतं कृतिका म्हणून आणि अचानक तिचा फोन आला मला . खूप भरभरून बोलली, लग्नानंतर काय काय झालं ते , काका - काकुंबद्दल , भावड्या (तिचा भाऊ) बद्दल , लहानपणाच्या सगळ्या आठवणींबद्दल,  त्यावेळी ५वी मध्ये आम्ही ज्या पद्धतीने वेगळ्या झालो होतो ते खूप लागल होत तीला . कशी आणि काय समजावणार होते तिला ? ते वय इतक कळण्याच नव्हत, एवढंच कसबस बोलू शकले. ती मात्र मला खूप लागल होतं ते सांगत राहिली आणि खूप वर्षांनी जाणवलं आपण पण तेवढाच प्रेम केलं होतं तिच्यावर कारण तिच्यानंतर तशी मैत्री कुणाशी झालीच नाही.  त्या नकळत्या वयातल्या मैत्रीने खूप काही शिकवलं होतं जे आता जाणवत आहे. आता मात्र तिला अंतर द्यायचं नाही हे पक्क ठरवलं आहे . तिच्यामुळे मला मैत्री कळली , मैत्रीमधलं प्रेम कळल. सध्या ती फिनलंड ला राहते . त्यामुळे अजून तरी आमची भेट नाही . पण लवकरच भेटू आम्ही.